प्रतिनिधी मुंबई,
राजभवनातील जल किरण या जवळपास दिडशे वर्षाचा इतिहास असलेल्या अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोंविंद, राज्यपालांच्या पत्नी श्रीमती विनोदा व राष्ट्रपती महोदयांच्या सुकन्या स्वाती कोविंद आदी उपस्थित होते.
जल किरण ही वास्तू ऐतिहासिक आहे. या अतिथीगृहात राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचे निवासस्थानी अतिथी कक्ष तयार करण्यात आला आहे. या जलकिरणचे नुतनीकरण करण्यात आले आहे.
ऐतिहासिक तोफा कोनशिला अनावरण
राजभवनात 2018 साली सापडलेल्या दोन भव्य अशा ब्रिटीशकालीन तोफा जलविहार हॉलसमोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या असून त्याच्या कोनशिलेचे अनावरण देखील राष्ट्रपती महोदयांनी यावेळी केले.
या ऐतिहासिक जुन्या तोफांचे महत्व लक्षात घेता राज्यपाल महोदयांच्या पुढाकाराने त्यांचे जतन करणार येत आहे. या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन, लांबी 4.7 मीटर तर अधिकतम व्यास 1.15 मीटर असा आहे.
राजभवनास भेट देणाऱ्या लोकांना तसेच इतिहासप्रेमी अभ्यासकांना या तोफा पाहता येतील.
पार्श्वभूमी :
भूमिगत बंकर :-
तीन वर्षांपूर्वी राज भवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते.
अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती.
ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्यक होते.
या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले.
या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतारा (Ramp) आहे.
बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे.
बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शविणारे कक्ष तयार करण्यात आले असून त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी पाहता येणार आहे. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.
जुळ्या तोफा
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे नोव्हेंबर-2018 साली दोन भव्य ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या होत्या. राज्यपालांच्या सुचनेनुसार दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या.
या तोफांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन राज्यपालांनी संरक्षण दलाच्या तज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना केली होती.
नुकत्याच या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वेट हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. राष्ट्रपतींच्या हस्ते या तोफांपुढे कोनशिला ठेवण्यात येणार आहे. राजभवनाला भेट देणाऱ्या लोकांना तसेच इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत. या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन असून, लांबी 4.7 मीटर तर अधिकतम व्यास 1.15 मीटर इतका आहे.
जल किरण
जवळ जवळ 150 वर्षे इतिहास असलेल्या ‘जल किरण’ या अतिथीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले असून या ठिकाणी राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांचेसाठी अतिथी कक्ष तयार करण्यात आला आहे. या नुतनीकृत वास्तूचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
जल भूषण
राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जल भूषण’ या वास्तूला 200 वर्षांचा इतिहास आहे. गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिन्स्टन यांनी बांधलेली ‘प्रेटी कॉटेज’ याच ठिकाणी उभी असल्याचे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. सन 1885 साली मलबार हिल येथील निवासस्थानाचे ठिकाणी ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. अनेकदा बांधली गेलेली ही वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले.
प्रस्तावित ‘जल भूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वैशिष्ट्ये जतन केली जाणार आहेत. या पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या ‘जल भूषण’ वास्तूची पायाभरणी देखील राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होत आहे.
No comments:
Post a Comment